Friday, 17 April 2026

हायकू

*हायकू म्हणजे काय आणि वा न सरदेसाईंचे हायकू :*

मराठीतील ख्यातनाम कवयित्री शिरीष पै ह्यांनी जपानी भाषेतला ' हायकू ' हा काव्यप्रकार मराठीत प्रथम आणला .
त्यांचे ' ध्रुवा ' , ' हायकू ' आणि  ' हायकूंचे दिवस ' असे प्रामुख्याने तीन हायकूशी संबंधीत संग्रह प्रकाशित झाले आहेत .
 
' हायकूंचे दिवस ' ह्या त्यांच्या संग्रहात त्यांनी हायकूविषयी सविस्तर लिखाण करून ' हायकू ' चे अंतरंग मराठी काव्यरसिकांसाठी उघड केले आहे .

https://youtu.be/XMEiw9OYNUw
 
मी शिरीष पैंना दिनांक १७.१२.२००० रोजी फोन करून त्यांना काही प्रश्न विचारले होते . त्यांनी मला सविस्तर उत्तरे देताना म्हटले होते की , जपानमध्ये सुमारे ५०० वर्षांपूर्वी एक राजा होऊन गेला . तो काव्यप्रेमी होता . राजा कविसंमेलने भरावीत असे . . विशेषतः ' काव्यासमस्यापूर्ती ' हा प्रकार त्यात असे . अशावेळी दिलेल्या समस्याओळीवरून सदर सभेत कवी आपापल्या कविता सादर करीत . हायकूचे हे मूळ स्वरूप . .
 
कालांतराने समस्येची ओळ लुप्त झाली . म्हणजे गाळली गेली . दिलेली ओळ सोडून उरलेल्या तीन ओळींची  रचना म्हणजे आजचा हायकू !
संमेलनात प्रतिसाद म्हणून कविजं / रसिकवर्ग ' होक्कू होक्कू ' असा घोष करीत . त्यावरून ' हायकू ' हे नाव रूढ झाले ! 
वर उल्लेखिलेल्या संग्रहात जपानात हायकू किती सन्मानित होता हे सांगताना शिरीषताई म्हणतात : हायकूवर निःसीम प्रेम असलेला बाशो नावाचा जो जपानी पंडित हायकूकार होऊन गेला तो आपल्या शिष्यानी रोज एक तरी हायकू लिहिलाच पाहिजे असे त्यांना सांगत असे . . नुसताच रोज नव्हे तर मरेपर्यंत रोज !
खरेच एवढे हे हायकूबद्दलचे प्रेम आणि वेड !
असे काही जपानी हायकूकार होऊन गेले की त्यांनी शेवटचा हायकू लिहून लेखणी खाली ठेवली आणि प्राण सोडला . .ते त्यांचे मृत्यूपूर्व हायकू ( Death Verse ) आजही उपलब्ध आहेत .
 
प्रस्तुत पुस्तकात शिरीष पैंनी अतिशय संवेदनशील मनाने ईत्यंभूतपणे लिहिले आहे ; ते मुळातच वाचणे अधिक योग्य होईल .

मूळ जपानी हायकू त्यांच्या तंत्राप्रमाणे ( अर्थात ' व्याकरण ' इ . ) अक्षरे मोजून ठरावीक शब्दांतच लिहिला जायचा . तरीही शिरीष पैंनी ह्या मर्यादेच्या अटीला  छेद देत स्वतंत्रपणे हायकू लिहिले ; ते अर्थातच कमीत कमी शब्दांची प्रमुख अट वगैरे मानूनच . म्हणून सुरवातीला जरी त्यांच्या हायकूंवर शब्दसंख्याचे नियम न पाळल्याबद्दल टीका झाली तरी मराठी भाषेचा योग्य तो बाज राखत जे हायकूलेखन केले ते नैसर्गीकच ठरले . आणि मराठी हायकूप्रेमींनी शिरीष पैंची शैली , लेखनातील स्वाभाविकता , नेमकी अशी सुबोध शब्दयोजना इ . गुणवैशिष्टयांची प्रशंसाच केली .
 
' हायकू हा मी एक उस्फूर्त उद्गार मानीत असल्याने मला त्याला अक्षरे मोजून बांधून टाकणे पसंत नाही ' असे त्या म्हणत असत .

अन्य भाषांतील कवींनीही जे हायकू त्यांच्या - त्यांच्या भाषांत लिहिले , त्यांनीही कधी वरीलप्रमाणे तंत्राची आंधळी नक्कल केली नाही .
थेडक्यात , आपल्या भाषेतील हायकूला स्वभाषेतील सौंदर्य आणि डौल हवा . मुख्यतः तो उस्फूर्त आणि सहज उतरला तरच हायकूचा उद्देश साध्य होईल , हा विचारच महत्त्वाचा आहे .

हायकूचे रचनात्मक वेगळेपण आणि वैशिष्ट्य प्रस्थापित करणारे जे किमान आवश्यक नियम आहेत तेच पाळावेत . उदा . तीन ओळींत रचना , कमीत कमी शब्द , पहिल्या - तिसऱ्या किंवा दुसऱ्या - तिसऱ्या ओळींत यमक , मुक्त शैली , लयबद्धता , शक्यतो निसर्गाशी संबंधितता इत्यादी . ह्यापेक्षा जास्त बडेजाव माजवू नये . 
 
हायकूत महत्त्व अनुभव घेण्याला आहे . उस्फूर्त उदगाराप्रमाणे  त्या अनुभवाची अभिव्यक्ती करण्याला आहे .
मराठी भाषेच सौंदर्य , गोडवा , वैशिष्टय आणि सहजता ज्यामुळे खुलेल अशी काव्यरचना कवीने करावी . हायकू क्षण कसा अनुभवायचा ह्याचा विचार कवीने करावा .
हायकूच्या पोटात एक जिवंत, घडलेली घटना असते . एक हकीगत असते . . अगदी क्षणमात्राची हकीगत . पण , तो क्षण इतका प्रभावी असतो - इतका अर्थपूर्ण असतो की जलाशयावर पडलेल्या चिमुकल्या थेंबांमुळे जशी तरंगाची वर्तुळे वाढत , विस्तारत असीम होत जातात , तसा तो क्षण बघणाऱ्याच्या मनात पसरत जातो .
. . केवळ एक क्षण . फक्त एक क्षण . ध्यानस्थ योगी एका क्षणाचा
आधार घेऊन जसा पार्थिवातून अपार्थिवात प्रवेश करतो , तसेच इथे घडते . हायकूकाराच्या दृष्टीने हा खरोखरीच समाधानाचा क्षण !
अशा अवस्थेप्रत जो वाचकाला नेऊ शकत असेल तोच ' खरा हायकू ' . अन्य हायकू कितीही चमकदार वाटले तरी ते शुद्ध हायकू नव्हेत . त्या सर्व हायकूसदृश रचना !
हायकू हा साध्या , शुद्ध बोलीत लिहायचा असतो . अशा अनलंकृत भाषेतील हायकूच वाचकाचे संवेदनशील मन जिंकू शकतो . पाल्हाळ हायकूला म्हणूनज वर्ज्य आहे . . नेमक्या शब्दांत हायकू अगदी चटकन सांगायचे ते अचूक सांगतो .
हायकू सोपा असतो ह्याचा अर्थ एक कविता म्हणून तो सामान्य असतो असे नव्हे .
 
. . हायकू ही एक बौद्धिक करामत नाही . किंवा तो अभिनव शैलीचा शोधही नाही . हायकू तुमच्यात , तुमच्या जीवनाच्या गाभ्यात दडलेल्या सत्याचे अकस्मात दर्शन घडवतो , तेव्हा तुम्ही  एकाएकी शांत नि अंतर्मुख होता .
. . हायकूसदृश रचना तुम्हाला एखादा जीवनविचार देईल किंवा भावदर्शन घडवील . पण तुम्हाला समाधी अवस्थेत फक्त जातिवंत हायकूच नेऊ शकेल . खरोखरीचा सुंदर हायकू वाचताच आपण मनाच्या आतील मूकतेत प्रवेश करतो .

श्रेष्ठ कवीलाही असा हायकू कधीतरीच करता येतो . चांगले हायकू त्याने अनेक लिहिलेले असतील पण शुद्ध हायकू जमणे हा एक योग्य आहे . . योगायोग आहे .

. . हायकू निर्माण करताना कवीला किंवा वाचकाला जी अपार शांती अनुभवायला येते ती त्या हायकुतील अर्थाहूनही अधिक महत्त्वाची आहे . हा आध्यात्मिक परिणाम हायकू फार सूक्ष्मपणे घडवीत असतो .
हायकू वाचताक्षणीच तरल अवस्थेत जाणारे मन हवे वाचकाचेही . 
अन्यथा कोणी म्हणू शकेल की ' ह्या हायकूत काय ठेवलेय ? ' साधं वाक्य तर आहे . . असं कुणीही लिहू शकेल , वगैरे .
हायकूच्या सरलतेकडे आणि सुगमतेकडे तुच्छतेने बघणाऱ्याला हायकूचा आत्मा गवसणार नाही .
 
समाधी अवस्थेचा क्षणही सुगम असतो . पण म्हणून तेथे पोचणारी वाट मात्र सोपी असते असे नाही . 
अपार मेहनत करून योगी त्या क्षणाकडे पोचलेला असतो . तो क्षण मात्र स्वतः अगदी साधा असतो . . तिथे शब्द संपतात .अर्थही संपलेला असतो .तो क्षण निरर्थक असतो . . अर्थ शोधण्याची धडपडही थांबलेली असते .
 
त्या क्षणाच्या कणाकणात उरते ती अपार शांती ! त्या शांततेत नांदतो  विश्वाचा आत्मा !
 
माणूस शांतीला मुकला आहे . म्हणूनच त्याची शांतीवर श्रद्धा बसत नाही .  
माणूस सारखा शब्दांच्या मागे धावत असतो . अर्थ शोधण्यासाठी निरर्थक शब्दांचे डोंगर उभे करतो अन मनाची गुंतागुंत वाढवीत बसतो . . हायकू नेमके ह्याच्या उलट करतो . कमीत कमी शब्दांकडे जाता जाता तो निःशब्दात विलीन होतो .
हे ज्याला जाणवेल , ह्याची ज्याला अनुभूती येईल , त्यालाच ' हायकू ' ह्या काव्यप्रकाराचे महत्त्व समजेल आणि पटेलही .
 
( ' हायकूंचे दिवस ' शिरीष पै ह्यांच्या लेखावरून ) 
 
आपला
वा न सरदेसाई
------------------------------
वा न सरदेसाई लिखित हायकू
https://youtu.be/XMEiw9OYNUw
--------------------------------
अन्य रचना  युट्युब चॅनल 
https://www.youtube.com/user/sardesaipramod
---------------------------------

Tuesday, 14 April 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर 
आज आपण एका अशा महामानवाच्या जयंतीनिमित्त एकत्र आलो आहोत, ज्यांनी केवळ एका समाजाला नव्हे तर संपूर्ण भारताला नवा विचार, नवे तत्त्वज्ञान आणि नवे स्वाभिमान दिले. ते म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

आजचा आपला विषय आहे  “बाबासाहेब समजून घेताना”.
हा विषय जितका सोपा वाटतो, तितकाच तो खोल, गुंतागुंतीचा आणि चिंतनशील आहे.

आज आपण बाबासाहेबांना किती ओळखतो?
आपण त्यांना फक्त १४ एप्रिलला हार घालतो, फोटो काढतो, सोशल मीडियावर पोस्ट करतो… आणि दुसऱ्या दिवशी विसरतो!
पण बाबासाहेब म्हणजे केवळ पुतळा नाहीत ते एक जिवंत विचार आहेत.
त्यांचे विचार हे काळाच्या पलीकडे जाणारे आहेत.
ते केवळ दलितांचे नेते नव्हते, तर ते मानवतेचे तत्त्वज्ञ, न्यायाचे योद्धे आणि आधुनिक भारताचे शिल्पकार होते.

मित्रांनो,
आज आपण एखादी छोटी अडचण आली तरी खचतो… पण बाबासाहेबांनी जे भोगले, ते कल्पनाही करणे कठीण आहे.
शाळेत पाणी पिण्यासाठीही त्यांना भांडे हाताळू दिले जात नव्हते.
बसायला जागा नव्हती.
मानव म्हणूनही त्यांना स्वीकारले जात नव्हते.
पण त्यांनी हार मानली का?
नाही!
त्यांनी अपमानाला रागात बदलले नाही…
तर त्याला ज्ञानाच्या शक्तीत रूपांतरित केले.

बाबासाहेबांनी दिलेला सर्वात मोठा मंत्र म्हणजे:
“शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा”
आजचा तरुण काय करतो?
मोबाईल, सोशल मीडिया, रील्स, आणि दिखाऊपणा…
पण बाबासाहेबांनी काय केलं?
कोलंबिया विद्यापीठातून शिक्षण,
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये अभ्यास,
अनेक पदव्या, अनेक विषयांवर प्रभुत्व
ज्ञान हेच त्यांचे शस्त्र होते.

बाबासाहेबांनी केवळ अधिकारांची लढाई लढली नाही…
तर त्यांनी स्वाभिमान जागवला.
ते म्हणाले   “जोपर्यंत तुम्ही स्वतःला कमी समजता, तोपर्यंत कोणीही तुम्हाला उचलू शकत नाही.”
आज आपण स्वतःला विचारलं पाहिजे 
आपण खरोखर स्वाभिमानी आहोत का?
आपण अन्यायाविरुद्ध आवाज उठवतो का?

की आपण फक्त शांत राहून सगळं सहन करतो?

भारतीय राज्यघटना म्हणजे काय?
ती फक्त कायद्याचा ग्रंथ नाही…
ती समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता यांची हमी आहे.
बाबासाहेबांनी राज्यघटनेत प्रत्येक नागरिकासाठी समान अधिकार दिले:
शिक्षणाचा हक्क
मतदानाचा हक्क
अभिव्यक्ती स्वातंत्र्य
सामाजिक न्याय
पण प्रश्न असा आहे. आपण या अधिकारांचा योग्य वापर करतो का?

बाबासाहेबांनी धर्मावर टीका केली, पण ते नास्तिक नव्हते.
ते म्हणाले,
“धर्म हा माणसासाठी आहे, माणूस धर्मासाठी नाही.”
आज समाजात काय चाललं आहे?
अंधश्रद्धा
जातीय भेदभाव
अज्ञान
बाबासाहेबांनी दिलेला मार्ग स्पष्ट आहे.
विवेक, विज्ञान आणि मानवता.

माझ्या बालमित्रांनो मित्रांनो,
बाबासाहेबांचा खरा वारसा तुम्ही आहात!
आज देशाला गरज आहे:
विचार करणाऱ्या युवकांची,
प्रश्न विचारणाऱ्या युवकांची,
अन्यायाविरुद्ध उभे राहणाऱ्या युवकांची,
फक्त नोकरी मिळवणं हेच यश नाही…
तर समाज बदलणं हेच खऱ्या अर्थाने यश आहे.

आज आपण बाबासाहेबांचे विचार वाचतो का?
की फक्त स्टेटस टाकतो?

“जय भीम” लिहिणं सोपं आहे…
पण बाबासाहेबांचा मार्ग जगणं कठीण आहे.

बाबासाहेबांनी आपल्याला काय दिलं?
समानतेचा हक्क,
शिक्षणाचा मार्ग,
स्वाभिमानाची जाणीव,
न्यायाची ताकद,
पण त्यांनी एक जबाबदारीही दिली,
“ही व्यवस्था टिकवण्याची आणि पुढे नेण्याची.”

आजही समाजात:
जातीयवाद आहे,
विषमता आहे,
अन्याय आहे,
मग प्रश्न असा आहे.
आपण बाबासाहेबांना समजून घेतलं का?

बाबासाहेब समजून घेणं म्हणजे काय?
बाबासाहेब समजून घेणं म्हणजे:
त्यांच्या विचारांचा अभ्यास करणं
त्यांच्या तत्त्वांचा आचरण करणं
अन्यायाविरुद्ध उभं राहणं
समाजासाठी काम करणं

मित्रांनो,
जर तुम्हाला बाबासाहेबांना खरं आदरांजली द्यायची असेल, तर:
पुस्तक वाचा
विचार करा
प्रश्न विचारा
अन्यायाविरुद्ध उभे रहा

मी स्पष्ट सांगतो,
बाबासाहेबांचा जयघोष करणारे खूप आहेत…
पण त्यांचे विचार जगणारे खूप कमी आहेत!

माझ्या  मित्रांनो,
तुम्ही ठरवा —
तुम्हाला फक्त नोकरी करायची आहे?
की समाज बदलायचा आहे?
बाबासाहेबांचा मार्ग निवडा  आणि इतिहास घडवा!

शेवटी मी एवढंच म्हणेन,
बाबासाहेबांना समजून घेणं म्हणजे त्यांचा फोटो लावणं नाही…
तर त्यांच्या विचारांना आपल्या जीवनात उतरवणं आहे.
“जीवन मोठं असावं, लांब नाही.”  हा त्यांचा संदेश आजही तितकाच प्रभावी आहे.

चला, आपण सगळे मिळून एक संकल्प करूया,
शिक्षण घेऊ,
विचार करू,
अन्यायाविरुद्ध लढू,
आणि बाबासाहेबांचे खरे अनुयायी बनू
जय भीम!
जय संविधान!