Tuesday, 27 September 2022

नवे वृध्दाश्रम....नवी यातनाकेंद्रे

"नवे वृध्दाश्रम....नवी यातनाकेंद्रे...!!!!!"
--------------------------------------------

(सचिन मधुकर परांजपे) लेख वाचा, नावासह शेअर करा
ज्यांनी आयुष्यभर खस्ता खाऊन, ओढग्रस्तीने संसार करत स्वत:च्या मुलाबाळांना वाढवलं आहे...मोठं करुन स्वत:च्या पायावर उभं केलं आहे अशांच्या अनेक मुलांनी अत्यंत हुशारीने वागून त्यांना वृध्दाश्रमाचा रस्ता दाखवला नाहीये, पण स्वत:च्या मुलांच्या जबाबदाऱ्या म्हाताऱ्यांच्या अंगावर टाकून त्यांचा अनेकवेळा गैरफायदा घेतला आहे आणि घरातच नवे वृध्दाश्रम काढले आहेत. सोनेरी पिंजऱ्यात आईबापांना बंद करुन टाकले आहे आणि हक्काचे बिनपगारी नोकर बनवले आहेत....
आसपास घडणाऱ्या काही घटना बघितल्या की अक्षरश: अंगावर काटा उभा रहातो. माझ्या माहितीतील कित्येक मुलांनी म्हाताऱ्यांच्या वात्सल्याचा आणि प्रेमाचा गैरफायदा घेऊन, त्यांना Taken for granted धरुन स्वत:ची मुले त्यांच्या जबाबदारीवर टाकून स्वत:च्या करिअरकडे लक्ष दिले आहे. साधारणत: साठी पासष्ठीनंतर मनुष्य मग तो स्त्री असो की पुरुष इतक्या वर्षाच्या संघर्षाला थकलेला असतो, कंटाळलेला असतो, वैतागलेला असतो....मुले मोठी झालेली असतात, त्यांचे संसार सुरु झालेले असतात. अशावेळी या संध्याछायेच्या कातरवेळी त्याला स्वत:साठी थोडा वेळ हवा असतो, विश्रांती हवी असते...पण नकळतपणे आणि अलगदपणे नातवंडांच्या जबाबदाऱ्या पुनश्च अंगावर येऊन पडतात आणि तो पुन्हा गुरफटला जातो....
म्हाताऱ्या अजीआजोबांना नातवंडांबद्दल अपार प्रेम आणि माया असते, नाही असं नाही. पण वयोमानामुळे, थकलेल्या शरीराने त्यांना रोज नातवंडांना न्हाऊमाखू घालणं, जेवण देणं, त्यांच्या उत्स्तवाऱ्या करणं, त्यांना हवं नको ते पहाणं हे शक्य होईलच असं नाही. पण मुलांच्या इमोशनल ब्लॅकमेल खाली दबून जाऊन त्यांना हे स्विकारणं भागच होऊन जातं, तोंडा दाबून बुक्क्यांचा मार होतो. सेटल झालेला बिझी मुलगा, बक्कळ पगाराची सुनबाई यांना करिअरमधुन वेळ नसतो, मग आपल्या नातवंडांचं कसं होणार? डे-केअरमध्ये त्यांची देखभाल कोण आणि कशी करेल? दिवसभराची मोलकरीण ठेवली तर ती मायेने करेल का? असे अनेक प्रश्न म्हाताऱ्यांनाच पडतात आणि त्याभरात त्यांना स्वत:ला न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्विकाराव्या लागतात.....
एकदा जबाबदारी स्विकारली की मग स्वत:चं आरामाचं वैयक्तिक आयुष्य नातवंडांच्या दावणीला बांधलं जातं...लफ्फेदार ड्रेस घालून सुनबाई कार घेऊन कामाला गेल्या की नातवाला किंवा नातीला ब्रेकफास्ट बनवून देणे, त्याचा डबा भरुन देणे, त्याला स्कूलबसपर्यंत सोडायला जाणं इथपासुन ते दुपारी आडनिड्या वेळेला नातू किंवा नात शाळेतून परत आली की स्वत:ची वामकुक्षी टाळून त्याला आंघोळ घालणे, जेवायला देणे, झोपवणे ही कामं करावी लागतात..
नातवंडांची इतकी प्रचंड काळजी घेऊनही जरा कुठे काही कमीजास्त झालं किंवा त्याची तब्येत बिघडली की..."लक्ष कुठे असतं हो तुमचं?" किंवा "तुमच्याच आईने काहीतरी खाऊ घातलं असेल माझ्या पोराला..." असे खडे बोलही ऐकावे लागतात म्हाताऱ्यांना...
कधीकधी तर संध्याकाळी सुन किंवा मुलगा आला की स्वत:चा लॅपटॉप उघडून बसतात आणि मग कधीकधी रात्रीच्या जेवणाचंही सासुबाईंनाच बघावं लागतं....सुन असते हाय-क्वालिफाईड...त्यामूळे तिला बोलून चालणार नसतं...एखादा शब्द जर कमीजास्त झाला तर स्वत:चाच मुलगा डोळे वटारुन बघू लागतो....वर वर छान दिसणा़ऱ्या आयुष्यांचे हे असले सोनेरी बंदिस्त वृध्दाश्रम आता जागोजागी दिसायला लागले आहेत...इथे सर्व सुखे हात जोडून उभी आहेत पण विश्रांती नाही, जबाबदाऱ्या संपलेल्या नाहीत, थकलेल्या शरीराला आराम नाही. अमेरिकेत मुलाकडॆ कौतुकाने गेलेले आईबाप चार महिन्यांनी उतरलेल्या चेहऱ्याने एअरपोर्टवर आलेले मी स्वत: बघितले आहेत. कालपरवापर्यंत मुलाच्या अमेरिकन नोकरीचं कौतुक करणारे काकाकाकू यानंतर पुन्हा अमेरिकेला जायचं नावही घेत नाहीत त्यामागे हीच कारणं आहेत.
तुम्हाला मुलंबाळं जन्माला घालून जर त्यांचं करणं झेपत नसेल तर एकतर नोकरीचा राजीनामा देऊन घरी बसा किंवा हृदयावर दगड ठेऊन मुलांना डे-केअर सेंटरवर ठेवा की....तुमचं करिअर हेच जर तुम्हाला अतिशय महत्वाचे असेल तर मुलंच जन्माला घालु नका हे बेस्ट नाही का?...आपण जन्माला घातलेल्या मुलांची काळजी आपल्याच म्हाताऱ्या आईबापांवर सोपवून स्वत: करिअरच्या नावाखाली नामानिराळे राहिलेल्या सुनामुलांची मला अक्षरश: कमाल वाटते. हे नवे "बंदिस्त सोनेरी वृध्दाश्रम" आता साठीसत्तरीच्या वयातील वृध्दांसाठी यातनाकेंद्रे बनली आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. आणि यातील दुर्दैव म्हणजे या वृध्दांचा होत असलेला कोंडमारा हा असह्य असला तरी त्याची घनता किंवा तीव्रता ही शब्दात व्यक्त करता येत नाही हा सर्वात मोठा त्रास आहे....!!!
-सचिन मधुकर परांजपे (पालघर)

मित्रांनो बोलते किंवा लिहिते व्हा

 
*मित्रांनो बोलते आणि लिहिते व्हा*
 अभिव्यक्ती हा माणसाचा अधिकार आहे, पण त्या अधिकाराचा तो कितपत उपयोग करून घेतो याबद्दल अनेकदा शंका येते. अभिव्यक्ती मग ती मौखिक असो किंवा लिखित असो. अभिव्यक्त होणं अत्यावश्यक आहे. एखाद्या गोष्टीचा, घडलेल्या घटनेचा, विचारांचा किंवा इतरांच्या कृतीचा ताण डोक्यात घेऊन जगणं म्हणजे शरीराची आणि मनाची हानी करणारा एखादा अणुबॉम्ब जवळ घेऊन जगणंच आहे. 
अभिव्यक्ती मौखिक असेल तर सहज संवाद म्हणून असो किंवा हितगुज म्हणून असो, लिखित असेल तर गद्य असो वा पद्य असो. कोणत्याही माध्यमातून व्यक्त होणं हे महत्त्वाचं आहे. हे व्यक्त होणं आपल्या मनातल्या साचलेपणाला मुक्त करत असतं, मोकळं करत असतं.
साचलेपण आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप घातक आहे. शारीरिक आणि मानसिक दोन्ही पातळीवरती हे साचले पण विविध व्याधी आणि विकार निर्माण करत असतं. 
जेव्हा अशा प्रकारे काही क्षार शरीरामध्ये साचतात त्यावेळेला शरीरामध्ये ट्यूमर किंवा किडनी स्टोनसारखे विकार होतात. जेव्हा हेच साचणारे पदार्थ घनरूपात ऐवजी मौसल किंवा महसूल रूपात असतात त्यावेळेला शरीरामध्ये गाठी निर्माण होतात आणि द्रवरूपात असतील तर शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पाणी तयार करतात. जर या साचलेपणाचे घाव शरीराच्या अंतर्गत झाले तर त्याचेच रूपांतर कॅन्सरमध्ये होतं आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे जर या ताणतणावामुळं मेंदू मधील छोट्या छोट्या रक्तवाहिन्यांना इजा झाली, तर ब्रेन हॅमरेज नावाचं पॅकेज आपल्या शरिराला दिलं जातं. प्रसंगी मृत्यूही ओढवतो म्हणून व्यक्त होणं, मोकळं होणं हे खूप महत्त्वाचं आहे. बोलून किंवा लिहून मोकळं झाल्यामुळे, व्यक्त झाल्यामुळे ताणतणाव नाहीसा होतो. ताणतणावापासून आपण मुक्त होतो आणि त्यायोगे ताणतणावामुळे होणारे विकार ज्याला सायको-सोमॅटिक विकार म्हणतात. त्याच्यापासून आपण स्वतःला वाचवू शकतो. मानसशास्त्रामध्ये ईएफटी नावाचा तंत्रच आहे इमोशनल फ्रीडम थेरेपी असे त्याला म्हणतात आपल्या मनात ज्या ज्या विचारांच्या साचलेल्या कोठ्या असतील त्या कोठ्या वेळोवेळी रिकाम्या करायच्या असतात. मौखिक रूपाने त्या रिकाम्या करू शकतो. आपण आपल्या परिवारासाठी, आपल्या मित्रमंडळी साठी वेळ देऊन किंवा त्यांचा वेळ घेऊन आपण आपलं साचलेपण दूर करू शकतो. 
लिखित रूपाने व्यक्त होण्यासाठी या मर्यादाही नसतात. समोर कुणी असलंच पाहिजे असं नाही. कागद किंवा मोबाईल, लॅपटॉप, संगणक या माध्यमावर केव्हाही, कुठेही, कसेही आपण व्यक्त होऊ शकतो. मोबाईल मध्ये अक्षर अथवा व्हाॅइस दोन्ही लेखनाची साधने उपलब्ध आहेत. व्यक्त होऊ शकतो लिहून डायरी लिहून घेतो शकतो कथा कविता लिहून व्यक्त होऊ शकतो. 
केवळ आनंद झाल्यावरच असं साहित्य लिहिलं पाहिजे असं नाही. तुमचा वैयक्तिक किंवा सामाजिक कोणतीही समस्या, प्रश्न असेल, तो जेव्हा जेव्हा तुमच्या मनाला भिडतो तेव्हा तेव्हा तुम्ही व्यक्त व्हायला पाहिजे, आणि हे व्यक्त होणे तुमच्यासाठी जसं फायद्याचा आहे. तसंच अनेकदा तुमच्यासारख्या समस्या निर्माण झालेल्या व्यक्तीलाही ते महत्त्वाचं असतं. दोघांच्यासाठी ते औषध म्हणून उपयोगी पडतं. जसा आपल्याला लिहिल्यानंतर आपण मोकळे होतो तसं काही वेळा वाचल्यानंतर सुद्धा आपल्या मनामधला हा साचलेपणा दूर होऊन या घातक विकारांपासून आपली सुटका होऊ शकते, म्हणून वाचलेही पाहिजे वाचन, मौखिक अभिव्यक्ती, लिखित अभिव्यक्ती ही तीनही रूपं तशी एका अर्थाने मानसिक विकारावर ती औषधाच काम करत असतात आणि ती शोधण्यासाठी कुठे निसर्गामध्ये किंवा मेडिकल शॉपमध्ये किंवा इतर समाजामध्ये जायची गरज नाही किंवा जेव्हा आपल्याला वाटेल तेव्हा ज्या त्या पद्धतीने आपण व्यक्त होऊ शकतो आणि आनंदी सुखी जीवनाचा मंत्र किंवा मार्ग आपल्याला सापडलेला असतो. 
लेखनाप्रमाणेच चित्र, शिल्प, नृत्य, नाट्य, गायन आणि वादन यापैकी एखाद्या कलेचं व्यसन आपणास तणावमुक्त करू शकतं. त्यांचाही आस्वाद घ्यायला हरकत नाही. व्यावसायिक पद्धतीनं या कला जोपासता येतातच, परंतु छंद म्हणूनही या कलांचा आपल्याला आस्वाद घेता येतो. त्या आपल्यासाठी औषधी ठरू शकतात. आणि आपल्या छंदातून निर्माण झालेल्या कलाकृती इतरांसाठीही औषधी ठरू शकतात. नकळतंही असं एखादं सत्कार्य आपल्या हातून होऊन जातं. 
                      
                                  ©chandu64
*OUT LET*

लाखो जीव घेणार्‍या क्रूर  *हिटलरने* आत्महत्या केली शेवटी.!••
सुंदर विचार देणारे *साने गुरुजी* आत्मघात करुन घेतात.
मनशक्ती नावाचं मनाला खंबीर करण्याचं शिक्षण देणारे लोणावळ्याचे *स्वामी विज्ञानानंद* मंत्रालयावरुन उडी मारुन जीव देतात.
आध्यात्मिक गुरु अशी ओळख निर्माण केलेले व कित्येकांना आधार देणारे *भैय्युजी महाराज* आपलं जीवन आपल्या हातानं संपवतात.
पॉझिटिव्ह विचार देणारा चित्रपट करुनही *सुशांत सिंग राजपुतनं* नैराश्यातून आत्महत्या केली.
-आणि आता सहा आठ महिन्यापूर्वी नैराश्याशी लढा कसा द्यायचा हे शिकवणाऱ्या *शीतल आमटे करजगी* आपलं जीवन संपवतात. 
- आजची नागपूर ची बातमी *उच्च विद्याविभूषित, दिवंगत कुलगुरू च्या पत्नी तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ज्योत्स्ना मेश्राम* यांनी नवव्या माळ्यावरून उडी घेऊन नैराश्यातून आत्महत्या करतात.

या काही सेलिब्रिटींच्या उदाहरणातुन काय शिकायचं आपण.? 

पाण्यात शांतपणे पोहोणारं बदक वरुन शांत दिसत असलं तरी पाण्याखाली त्याचे पाय वेगानं हलत असतात. शांत पोहोतोय हे दाखवण्यासाठी फक्त. त्याचे कष्ट त्यालाच माहित असतात.

*माणुस वर वर दिसतो तितका आतून खंबीर असेलच असं नाही.* मनात वेगळी खळबळ असु शकते त्याच्या, जी आपल्यापर्यंत पोहोचत नसते किंवा तो त्या आनंदी आणि सुखी चेहर्‍याच्या आड लपवत असतो, लपवण्याचा प्रयत्न करत असतो.  शेवटी काय...?? वर सुंदर ताजमहाल असला तरी खाली पायात कबरच आहे, हे विसरुन चालत नाही.

भय्यूजी महाराजांनीआत्महत्या केल्या नंतर ABP माझा चँनलने एक परिचर्चा घडवून आणली होती.
त्यात बोलताना भय्यूजी महाराजांचे मित्र - अशोक वानखेडे यांनी मानवी स्वभावाचा फार चांगला पैलू सांगितला. भैय्यूजी महाराज स्वतः एक "अध्यात्मीक" गूरू होते, परंतू ते एक व्यक्ती पण होते. आपल्या मनातील "स्ट्रेस"बाहेर काढायला त्याच्या जवळ *"outlet"* नव्हता. डॉ. शितल आमटे,
(बाबा आमटे यांची नात - त्याचं ही अगदी भैयु महाराजासारखं झाले)

इतकं महत्वाचं असतं का हे outlet.?
होय !
कोट्यावधी रूपये खर्च करून पाण्यासाठी *विशाल धरण* बांधलं आणि समजा त्याला outlet च दिले नाही तर काय होईल? निश्चितच धरण फूटेल. इतकं महत्वाचं असते हे *waste weir* ...मानवी शरीर म्हणजे विवीध पंचतत्वापासून सांधलेलेलं एक *धरणच* आहे. या शरीरात समस्यांची आवक अती प्रमाणात झाली तर हे शरीररूपी धरण फूटेल की राहील ?

मुंबई का तुंबते? पुरेसे outlets राहिले नाहीत.

म्हणून आपलं outlet सदैव सताड उघडं ठेवा. आपल्या तोंडाचे *outlet*  वापरून आपल्या समस्या, आपल्या माणसांना सांगा. आपल्या अंर्तमनाचं outlet open करण्यासाठी meditation चा अवलंब करा आणि शक्य झाल्यास जगातील सगळ्यात मोठं *outlet* म्हणजे आपले डोळे, ते उघडा.फुटून जाऊ द्या अश्रूचा बांध...वाहून जाऊ द्या.. स्ट्रेस, दूःख, उपेक्षा.. पिस्तोलच्या गोळीने डोक्याला छिद्र पाडण्यापेक्षा, पंख्याला लटकण्यापेक्षा.. हे केव्हाही सोप्प नाही का.?

*म्हणूनच मित्र नावाच्या खांद्याचा आधार घ्या. मन मोकळं करा. बेस्ट आउटलेट परीवार आणि मित्र!*
हसा ! बोला ! रडा ! भांडा !
व्यक्त व्हा !!  मुक्त व्हा.. !!

*काळजी घ्या....*

  🙏😊🙏सोडून गेल्यावर *"ᴍɪss ʏᴏᴜ"* म्हणण्यापेक्षा

सोबत आहे तोपर्यंत *"ᴡɪᴛʜ ʏᴏᴜ"* म्हणा आपुलकीची माणस मिळायला खुप मोठं भाग्य लागतं. 🙏🙏🙏🙏 
*समस्त मित्राना समर्पित ..*

Wednesday, 21 September 2022

हळदी-कुंकवाची पावलं रक्ताळण्या आधी...

देवघरापासून उंबऱ्यापर्यंत उमटलेली 
तुमची हळदी-कुंकवाची पावलं  
उंबऱ्याबाहेर चौकापर्यंत जाताना 
कधी रक्ताळतील 
नाही सांगता येत हल्ली

तुम्ही कितीही जपून, सावरून चालायचा 
केलात प्रयत्न 
तरी आजूबाजूच्या वातावरणातले व्हायरस 
कधी, कसे प्रबल होतील 
हेही नाही सांगता येत 

आपल्या प्रश्नांची उत्तरे वदऊन घेण्यासाठी 
टपलेले वेताळ 
विक्रमाच्याच पाठीवर बसून 
फिरत आहेत गल्लोगल्ली

तुमचं स्त्रीलिंगी असणं 
हा तुमचा दोष...? 
आई बापाचे हतबल मनगट? 
की पिसाळलेल्या खविसांची मुजोरी? 
नाही सांगता येत नेमकं

पण एक नक्की
त्या व्हायरसांच्या आत्म्याला 
फुटत असतो पहिला पंख 
तेव्हाच सावध होऊन दिलात डंख
तर कदाचित 
आई बापाचा प्रत्येक दिवस 
समाधानात मावळेल

आणि त्याहीपेक्षा कपडे असतात 
लज्जा आणि अब्रूच्या रक्षणासाठी 
डोळे असतात बरं वाईट निरखण्यासाठी 
जीभ असते मनातल्या प्रत्येक 
शंकेचे निरसन करण्यासाठी 
किंवा विचारांच्या अभिव्यक्तीसाठी
म्हणून
करावं हितगुज आई-बापाशी, 
बहिण-भावाशी मैत्रीच्या नात्यानं
उतावळेपणा सोडून 
संयमाने प्रत्येक प्रश्नाला द्यावं उत्तर
हे ठेवलंत लक्षात कायम 
तर प्रश्नच उरणार नाही

                     *©रमेश*

बहुमूल्य विचार


काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे सहा
दोष. यांनाच षड्रिपु म्हणतात. फार्सी भाषेत यांना
आएब म्हणतात. हे सहा आएब ज्याच्या अंगी ठासून
भरलेले असतात त्याला साहेब म्हणतात.
या सहा दोषांना सहज धारण करणाऱ्यास साधारण
म्हणतात.
या सहांना मान्य करणाऱ्यास सामान्य म्हणतात.
या सहांना आपल्या धाकात ठेवणाऱ्यास साधक
म्हणतात.
या सहांना अधू करणाऱ्यास साधू म्हणतात.
या सहांचा संपूर्ण अंत करणाऱ्यास संत म्हणतात
आणि या सहांचा अर्थ नीट समजून घेऊन स्वतःची
आत्मोन्नती करतो त्याला समर्थ म्हणतात.

Tuesday, 20 September 2022

Waiter Moon यांच्या इंग्रजी कवितेचा मराठी भावानुवाद

साहित्यिक व्यक्ती म्हणून असते 
स्वतःसाठी, परिवारासाठी, घरासाठी 
पण त्याचं साहित्य प्रतिनिधित्व करतं समाजाचं 
केवळ आपलं वैयक्तिक दुःख 
तो नाही करीत व्यक्त 
कथा, कविता, साहित्यामधून 
ते सोसण्याची ताकद असते त्याच्यात 
नाही करत तक्रार कोणाकडे 
आणि चुकून कोणी केला प्रयत्न तसा 
आपलं दुखणं इतरांना विकण्याचा 
तर त्याच दिवशी त्याच्यातल्या 
साहित्यिकाचा अंत होतो 
चिखलात राहूनही सुंदर पुष्प उमलवणाऱ्या 
कमळासारखं असतं त्याचं जीवन
त्याच्या वैयक्तिक दुःखासाठी असतात 
आत्मकथन, चरित्र, ललितबंध, 
आत्मचरित्राचे पर्याय 
जेव्हा तो पाहतो आपल्या आसपास 
गहिवरलेली मनं 
तेव्हा होतो अस्वस्थ 
आणि त्याचं हृदय उतरतं कागदावर 
रंग, माती, शब्द, प्रतिमा, 
प्रतिकांच्या माध्यमातून 
चित्र, शिल्प, कथा, काव्याच्या रुपानं
तसा कधीच कुणाला 
अंत लागत नाही 
साहित्यिकाच्या अंतर्मनाचा 
त्याच्या मनाची खोली, लांबी 
आणि रुंदी असते 
अनंत अवकाशातील पोकळीएवढी 
जशी वाऱ्याची सावली कोणी नाही धरू शकत 
आणि मारून काठी पाण्यावर 
नाही दुभंगू शकत लाटा 
किंवा फाटक्या हाताने नाही अडवू शकत 
सूर्यकिरणांची प्रखरता 
तसं असतं त्याचं जगणं. 
खरंतर तो कधीच विकत नाही 
आपलं दुखणं इतरांना 
अगदी मोफतही
परकाया प्रवेशाचं अद्भुत तंत्र 
ज्याला येतं आत्मसात करता 
तोच होतो साहित्यिक
जीवनातील मॅरेथॉन जिंकण्याच्या जिद्दीने 
बाकी सारे ढेपाळतात 
एक दोन शर्यतीत 
कासवेच ती 
प्रत्येक ससा गाजराच्या अभिलाषेनं
भुलून जाईल अशी वेडी आशा
मनात चिकटवून धडपडणारी
ऊर फुटेतोवर टाचा घासणारी
एव्हरेस्ट सर केल्यानंतरही
ज्याच्याकडे असते हिम्मत
अवकाशातील अनंत पोकळीतील
ग्रहगोल आणि नंतर चक्क 
सूर्यावर पाऊल टाकण्याची
दि:क्कालाच्या आरपार असते 
त्याची दृष्टी विश्वविजयी स्वप्नं साकार करणारी

                              Waiter Moon

Monday, 19 September 2022

अनुल्लेख


          अनुल्लेख

देतील दु:ख अथवा यातना
जे असेल, जसे असेल 
तसेच साहीत राहीन 
जोवर ते सोसण्याची ताकद 
असेल माझ्याकडे 
कुणाकडे नाही करणार तक्रार 
अथवा मागणार नाही दाद 
आक्रंदून आक्रोशही मांडणार नाही 
किंवा पुंगळी सोडणार नाही 
कुठच्या कंपूत 
कुणाशी कानपिचक्या 
मुळीच करणार नाही 
चौकात बोंब मारणं तर फारच दूर
आणि ते जे करत आहेत 
त्यांना कळत नाही 
आपण काय करत आहोत 
म्हणून क्षमा करणार नाही 
किंवा शापही देणार नाही 
कारण क्षमेसाठी 
फार मोठं काळीज असावं लागतं 
जे कुरतडून उंदरांनी बोतर केलं आहे
आणि शापानंतर उ:शापाची विनवणी असते
जेव्हा त्यांना होईल उपरती
आपल्या कठोर कर्माची
ते स्वत:च झुरतील
किंवा म ... ... ... 
अनुल्लेखाने

                        *©रमेश*

Saturday, 17 September 2022

सौंदर्य सारे रचनेत असते


ढढढ

कोकिळा आणि कोकीळ


              वसंत ऋतुच्या आगमनापासून ऐकू येणारा 'कुहूऽऽऽ कुहूऽऽऽ' आवाज पुढे ऑगस्ट-सप्टेंबरच्या अखेरीस ग्रीष्मातही तसाच आवाज ऐकू येतो. कुहू अशी साद ऐकू आली की 'कोकिळेला कंठ फुटला म्हणायचा' असे बऱ्याच जणांच्या तोंडून सहज उद्गार निघतात.

            मात्र कोकिळा ही मादी असून ती कधीच सुंदर आणि गोड गात नाही किंवा ‘कुहूकुहू’ आवाज करीत नाही. मादीचा आवाज क्विक-क्विक-क्विक असा असतो. बऱ्याच जणांना माहीत नसते की पंचमातील साद कोकिळेची नसून कोकीळ या नर पक्ष्याची आहे. असे बघण्यात आले आहे की चिमण्या व इतर पक्षी पहाटे जशी चिवचिवाट करतात किंवा एकसुरात विशिष्ठ आवाज करत एकमेकांशी संवाद सादत असतात तसे कोकीळ पक्षी समूहाने करीत नाहीत, तसेच इतर पक्ष्यांच्या मनानी कोकीळ पक्षाचा आवाज खूपच मोठा असतो साधारण अर्ध्याहून अधिक क्षेत्रफळ व्यापले जाते. आपल्याला काही सांगायचे असेल तर त्यासाठी स्पीकर लागतो. कोकीळ नर पक्षाच्या आवाजाचा चढ उतार राग, प्रेम, आणि बऱ्याच गोष्टी सांगून जाते. ‘या मधुर आवाजाने अनेक कवी व लेखकांच्या साहित्यात कोकिळेने महत्त्वाचे स्थान मिळवले आहे. पण बिचारा कोकीळ 'कुहू कुहू' असे वारंवार ओरडत राहून त्याचा गळा सुजला तरी त्याच्याकडे कुणाचे लक्षच नसते ही गोष्ट अधोरेखित करण्यासारखी आहे.

परमेश्वराने जीवांची निर्मिती करताना प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तूत तसेच वनस्पती, पक्षी आणि प्राणीमात्रात काहीना काही वैशिठ्ये मुद्दामुनच ठेवली आहेत जसे आवाज, आकार, रंग, दिसणे आणि त्यापाठी काहीतरी कारण असलेच पाहिजे. असो.
विविध पक्षांची किलबिल पहाटेच्या शांतवेळी सगळ्यांनी ऐकली असेल. आपण जंगलात भटकंतीला गेलो असता, किंवा परसदारी आपण नेहमी विविध तऱ्हेच्या पक्षांनी काढलेल्या वेगवेगळ्या आवाजाने त्यांच्या मित्र मैत्रिणींना घातलेल्या सादेने, कधी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून शत्रू पासून सावध करण्यासाठी काढलेल्या विविध आवाजाने मन अचंबित होते आणि हे बघण्यात आणि ऐकण्यात खूप मजा वाटे !

कोकीळा पक्षी कावळ्याच्या घरट्यात अंडी घालतो आणि ती उबविण्याची जबाबदारी सोपवितो. कावळा त्याच्या घरट्याकडे कोणासही फिरकू देत नाही. तो त्याच्या घरट्याचे जीवापाड रक्षण करीत असतो. कावळा आणि कोकीळा या दोन पक्षात मोठे वैर आहे. कोकीळ पक्षी कधीच घरटी बांधत नाहीत ते कावळ्याच्या घरात अंडी घालतात आणि ती उबविण्याची जबाबदारीही कावळ्याकडे सोपवितात. अंडी दुसर्‍याच्या घरट्यात घालणे, ती न उबवणे, पिल्ले झाली कि त्यांना चारा पाणी न देणारा हा पक्षी जो फक्त अंडी घालतो आणि पिल्लांच्या पालन पोषणाची संपूर्ण जबादारी कावळ्यावर सोपवतो. वसंत ॠतूत कुहू कुहू गाणारा हा पक्षी आंबा, आणि बाभळीच्या दाट झाडीत जास्त प्रमाणात आढळतो.

कोकीळ मादी बहुदा कावळयाचं घरटं अंडी घालण्यासाठी शोधत असते. कोकीळ नर व मादी ऐतोबा आहेत. बहुतेक सर्व पक्षी आपल्या कुवतीनुसार सुबक वा ओबडधोबड घरटं तयार करतात. पण कोकीळ नर मादींना 'असावे घरकुल आपले छान' ही कवी कल्पना वाटत असावी. मूर्ख लोक घरं बांधतात यावर त्यांचा विश्वास असतो. घरटं बांधलं नाही तरी यथाकाल अंडी देण्याची वेळ येते मग कावळीच्या नकळत तिथे कोकीळ मादी अंडी घालते. कावळी मादी ती अंडी उबवते. बाहेर आलेल्या पिलांना भरवते. ही पिले उडून जाईपर्यंत तिला त्याचा थांगच लागत नाही. तसे बघता पक्षात धूर्त आणि चतुर ‘कावळा’ पक्षी असावा पण येथे अपवाद आढळतो.

नर कोकीळ कावळयासारखाच काळा कुळकुळीत पण जरा सडपातळ आणि डौलदार दिसतो. महत्त्वाचा फरक आहे तो म्हणजे त्याचा लाल डोळा. जसा माणिक लाल रंगाचा असतो तसा त्याचा भास होतो. मादी कोकीळ हा वेगळाच पक्षी आहे इतपत वेगळी वाटते. नर नखशिखांत काळा, मादी मात्र फिकट राखी रंगावर त्याच गडद रंगानं खडी काढावी अशी. नराची नजर गरीब तर तिची कावेबाज. तिच्या अप्पलपोटया स्वभावाचे दर्शन बऱ्याच जणांना अनेकदा घडले असेल.
दर १८ वर्षांनी 'कोकीळा व्रताचा' महिना येतो त्यावेळी कोकीळेचे दर्शन झाल्याशिवाय किंवा आवाज ऐकल्याशिवाय भाविक महिला अन्नग्रहण करीत नाहीत. त्यावेळी अनेक कोकिळ नरांना लोकांकडून बंदीवास धडवला जातो याकडे पक्षी मित्रांनी काळजी घ्यावयास पाहिजे.

हिवाळ्याची सुरूवात होत असता मात्र हा एकदम गडप झाल्यागत वाटतो. कोकिळ पक्षी संपूर्ण भारतभर सर्वत्र आढळतो तसेच बांगलादेश, पाकिस्तान, म्यानमार श्रीलंका येथेही याचे वास्तव्य आहे. कोकिळ भारतात निवासी आणि स्थानिक स्थलांतर करणारा पक्षी आहे. कोकिळ पक्षी मुख्यत्वे झाडावरच राहणारा असून तो दाट पाने असलेल्या झुडपी जंगलात, बागेत, शेतीच्या भागात राहणे पसंत करतो. कीटक, फुलपाखरे, सुरवंट, फळे, मध हे यांचे आवडते खाद्य आहे.

उन्हाळ्याची चाहूल लागताच सर्वत्र कोकीळ पक्ष्याचा कुहू-कुहू-कुहू आवाज ऐकू येतो. हा आवाज. हिवाळ्याची सुरुवात होत असता मात्र हा एकदम गडप झाल्यासारखा वाटतो.हा नरपक्ष्याचा आवाज असतो. याच्या मादीचा आवाज किक-किक-किक असा असतो. हा पक्षी आपले एकुलते एक अंडे कावळ्याच्या किंवा डोमकावळ्याच्या घरट्यांत घालतात.

वर्णन

साधारणपणे कावळ्याएवढा (१७ इंच) आकारमानाचा हा पक्षी असून शेपटी लांब असते. नराचा मुख्य रंग काळा, डोळे गडद लाल रंगाचे चोच फिकट पोपटी रंगाची असून मादीचा मुख्य रंग गडद तपकिरी व त्यावर पांढरे-बदामी ठिपके-पट्टे असतात. याच्या किमान तीन उपजाती आहेत

आढळ

कोकीळ पक्षी संपूर्ण भारतभर सर्वत्र आढळतो तसेच बांगलादेशपाकिस्तानम्यानमारश्रीलंका येथेही याचे वास्तव्य आहे. कोकीळ भारतात निवासी आणि स्थानिक स्थलांतर करणारा पक्षी आहे.

वसतिस्थान

कोकीळ पक्षी मुख्यत्वे झाडावरच राहणारा (Arboreal) असून तो दाट पाने असलेल्या झुडपी जंगलात, बागेत, शेतीच्या भागात राहणे पसंत करतो.

अन्न

कीटकफुलपाखरेसुरवंटफळेमध पक्ष्याची अंडी हे यांचे खाद्य आहे. म्हणजेच हे पक्षी मांसाहार व शाकाहारही पाळतात.

वीणीचा हंगाम

मार्च ते ऑगस्ट हा काळ कोकीळ पक्ष्यांचा विणीचा काळ असून हे पक्षी आपले घरटे बांधत नाहीत, तसेच ते आपल्या पिलांची देखभालही करत नाहीत. मादी (कोकिळा) फिकट हिरव्या-राखाडी रंगाची त्यावर लालसर-तपकिरी ठिपके असलेले अंडे तिला दिसेल अशा कोणत्याही इतर पक्ष्याच्या घरट्यात सोडून जाते. 

आपल्या घरट्यात सोडून दिलेली अंडी उबविणे, पिलांना खाऊ घालणे वगैरे कामे त्या घरट्यात राहणारे माता-पिता करतात.त्यांची स्वतःची पिले अंड्यातून बाहेर येण्याआधी बहुधा कोकिळेची पिले बाहेर आलेली असतात. त्यांची वाढही इतर पक्ष्यांच्या पिलांच्या मानाने वेगाने होते.

 

Sunday, 11 September 2022

कफन को

.        *कफन को...*
तो गेल्याची बातमी
ग्रुपवर फिरत आली

आणि
"असा अचानक
काय झालं होतं
कालच भेटलो होतो
खरं वाटत नाही
खूप चांगला मित्र होता"

अशा असंख्य प्रतिक्रिया उमटल्या
शोकमग्न सहचारिणी
समजूनही सांगू शकली नाही
त्याचा देह गुरफटला होता अपुऱ्या कफनात

तेराव्याला गोडधोड खाऊन
त्याच्या आठवणीही
अनंतात विलीन झाल्या
सर्वांच्याच होतात

मात्र तरीही
*_'खिसा नसतो कफनाला'_*
हे आम्हाला केव्हा कळणार?

                    *©रमेश*

Sunday, 4 September 2022

दुर्मीळ क्षण

अलीकडे प्रवास तर नित्याचा झालाय. आठवड्यातून किमान तीनदा बाहेर जावं लागतं. मित्रांचे संगतीने किंवा संस्थांच्या कामासाठी फिरत असताना मग वेळ झाली की चहा घेणं किंवा जेवण ओघानेच येतं. 
       "ज्या भागात जावे तिथलेच खावे" हा सन्मित्र मिलिंदचा मंत्र जपायचा प्रयत्न असतोच. मात्र ऐनवेळी घरातून शिदोरी दिली तर नाकारता येत नाही. शिवाय 'बाहेरचं काही खाऊ नका, वाट्टेल तिथले पाणी पिऊ नका' असा गृहमंत्र्यांचा सल्ला असतोच. 
      आज आमचे सहकारी मित्र आणि बालकुमार सभेचे कार्यवाह परशराम आंबीसर यांना मिळालेला राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार स्वीकारण्यासाठी कालीका मंदिर संस्थान नाशिकला जात होतो. सोबत डॉ. श्रीकांत पाटील, पी. एस. पाटील, गणेश पाटील, पाडळीकर होते. 
       आज गणेशोत्सवातील गौरी भोजनाचा दिवस असला तरी सकाळी लवकर थोडा नाश्ता करूनच बाहेर पडल्यामुळे दुपारी बाराच्या दरम्यान पुणे-नाशिक रोडवरील चोफुलाच्या अलीकडे गेल्यानंतर पोटपूजा करावी अशी चर्चा सुरू झाली. दुपारची वेळ झाली असली तरी सकाळी थोडा नाश्ता झाल्यामुळे जेवायची काही इच्छा नव्हती.  डॉ. पाटील म्हणाले घरातून गौरीच्या नैवेद्याची पुरणपोळी व भाजी दिलेली आहे. थोडी थोडी खाऊ आणि चहापान करू. मग पर्यायांचा शोध सुरू झाला हॉटेल, ढाबा की टपरी! 
       अलीकडे बऱ्याच हॉटेलमध्ये किंवा चहाच्या टपरीवरती एक बोर्ड लावलेले आढळतो 'येथे बाहेरील पदार्थ खाऊ नयेत' आणि मग सोबत खाद्यपदार्थ असणाऱ्यांची थोडीशी अडचण होते. म्हणून रस्त्याच्या डाव्या बाजूला टपरीचाच शोध घेणे चालू झाले. 
      रस्त्याच्या बाजूला शिव मल्हार हॉटेल असे एक नाव दिसलं आणि मग आम्ही तिथं सहज चौकशी करूया म्हटलं. पुन्हा अपमान होण्यापेक्षा अगोदर विचारलेलं बरं म्हणून तिथल्या मामांना विचारलं "मामा आम्ही कोल्हापूर हून नाशिकला चाललो आहोत. चहा घेणार आहोत आणि चहाबरोबर आमच्याबरोबर असलेल्या पोळ्या खाणार आहोत. आम्ही खाऊ का?"
       मामांच्या अगोदर मामांच्याकडे कामासाठी असणारा मालवाला भाऊ म्हणाला, "अहो तुम्ही चहा घ्या नाहीतर नाही घ्या, पण तुम्हाला जे काय तुम्ही बरोबर आणलेलं आहे ते इथे खायला कुणाची बंदी नाही आणि आम्ही कोणालाही अडवत नाही. तशी सक्त ताकीदच आहे आम्हाला." 
       खरंतर असे क्षण आणि अशी स्थिती दुर्मिळ होत चाललेली आहे. अशी मायेची माणसं किंवा आपुलकीने सेवा देणारी माणसं खेड्यापाड्यातूनही कमी होत चालली आहेत. म्हणून हा दुर्मिळ योग आपल्या लेखनात व मोबाईल कॅमेऱ्यात बंदिस्त करावा असं मला वाटलं. 
    सोबत बनियनवर आहेत ते या शिव मल्हार हॉटेलचे मालक आहेत. आणि डोक्याला रुमाल बांधलेले जे आहेत ते भाऊ आहेत. ते सेवा देण्याचं काम इथे करत असतात. हा अनुभव आपल्याशी शेअर करावा वाटला.