कोल्हापूर, ता.७ ऑगस्ट, २०२२: 'यशवंतराव घाटगे संस्थानिक शाहू महाराज झाले नसते तर...' हे पुस्तक भूतकाळाचा आढावा घेणारे, वर्तमानकाळाचा विचार सांगणारे व भविष्याचा मागोवा घेणारे, असा त्रिवेणी संगम असलेले आहे. त्यामुळे हे पुस्तक वाचनीय, तितकेच चिंतनशील असून, शाहू महाराजांचे कर्तृत्व समजून घेण्यास मदत करणारे आहे, असे मत प्राचार्य डॉ. जे. के. पवार यांनी केले. या पुस्तकाच्या आयोजित परिसंवादामध्ये ते बोलत होते. या परिसंवादामध्ये ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत डॉ. सुभाष देसाई, वाचनकट्टा संकल्पक युवराज कदम, भुयेवाडीच्या सरपंच राणी पाटील व अनिसच्या सीमा पाटील यांनी सहभाग घेतला होता. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती लोकोत्सव समिती, वाचनकट्टा बहुउद्देशीय संस्था, शिवराज विद्या संकुल (गडहिंग्लज) तर्फे प्रा. किसन कुराडे यांनी लिहिलेल्या 'यशवंतराव घाटगे संस्थानिक शाहू महाराज झाले नसते तर...' या पुस्तकावर डॉ. पवार यांनी भाष्य केले. शाहू स्मारक भवनात हा कार्यक्रम झाला. डॉ. पवार म्हणाले, की देशातील अनेक महापुरुषांचा मृत्यू हा वयाच्या ५० शीच्या आत झाला. हाच विषय घेऊन संशोधन करण्याची गरज आहे. राजर्षी शाहू महाराज यांचे कर्तृत्व समाजहित जोपासणारे आणि तितकेच व्यापक आहे. हे कर्तृत्व मर्यादित चौकटीत बंदिस्त करून चालणार नाही, तर त्यांच्या कर्तृत्वावर व्यापक चिंतन घडले पाहिजे. लेखक प्रा. कुराडे म्हणाले, की शाहू महाराजांचे कर्तृत्व समाजाला पुढे घेऊन जाणारे आहे. त्यांच्या कार्याला तत्त्वज्ञानापासून समाजशास्त्रापर्यंत अनेक पैलू आहेत. ते सूक्ष्म बारकाव्यानिशी समजावून घ्यावे लागतील. त्यातूनच शाहू महाराजांचे कार्य नव्या पिढीपर्यंत अधिक प्रभावीपणे पोचावे, अशा उद्देशाने हे पुस्तक लिहिले आहे. डॉ. सुभाष देसाई म्हणाले, राजर्षी शाहू एक राष्ट्रीय नेते कसे झाले असते याचे विवेचन खूप छान चिंतनशील पद्धतीने वाचायला मिळते. एकूणच छत्रपती पद याची व्याप्ती याचा विस्तार एक दिशादर्शक ठरणारे लिखाण या पुस्तकातून झाले आहे. शाहू महाराज व्यक्तिस्वातंत्र्याला कसे मुकले याची अनेक उदाहरणे या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतात. पुढे देसाई म्हणाले, भूतकाळ कल्पनाविलास यापलीकडे जाऊन भविष्य काळावर वेध घेणारे लिखाण आता कुराडे सरांनी करावे यातून समाजातील अराजकता कमी होण्यास मदत होईल. त्याच बरोबर हसन देसाई, राणी पाटील व सीमा पाटील यांनी या पुस्तकातील राजर्षी शाहूंचे विचार आजच्या काळात किती महत्त्वाचे आहेत आणि त्या विचारातील शुद्धता किती उपयुक्त आहे त्याची मांडणी केली. समीक्षक चंद्रकांत निकाडे यांनी आपल्या खुमासदार भाषेत परखड समीक्षा केली. पुस्तकातील व्याकरण दोष याबरोबर काही भाषेतील दोष याची स्पष्ट मांडणी त्यांनी आपल्या विवेचनात केली. याच बरोबर लेखकाने मांडलेली विचार हे संदर्भांना धरून व आजच्या काळात किती उपयुक्त आहेत याची साधार मांडणी केली. या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप कॉम्रेड चंद्रकांत यादव यांनी केला. पाहुण्यांचा परिचय पी. ए. देसाई यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नसीमा जमादार व डॉ. श्रद्धा पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे आभार मुरलीधर देसाई यांनी मानले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य जी. पी. माळी, केशव हरेल, एस. डी. पाटील, ब्लॅक पँथर पक्षाचे संस्थापक सुभाष देसाई, कैलास जांभळे, शर्वरी कुरणे, क्रांतीदेवी कुराडे, ॲड. दिग्विजय कुराडे, रमेश मोरे, प्रमोद पुंगावकर, संभाजीराव जगदाळे, विश्वास सुतार आदी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment