🐂🐂 *बेंदूर* 🐂🐂
आमच्या गावी देशी (महाराष्ट्रीय) बेंदूर साजरा करण्याची प्रथा आहे, आणि त्याअगोदर २७ दिवस कर्नाटकी (कोकणा) बेंदूर व्हायचा. शेजारच्या गावामधून हा साजरा केला जायचा. दुसऱ्या दिवशी शेजापाजारचे मांसाहरी लोक ठेवणीतले कपडे लेवून, सज्ज होऊन बाहेर पडायचे. आमच्या शेजारी लखूनाना राहायचा. त्याची एक वेगळीच स्टाईल होती.तो पाहुण्यांकडं जाताना नवा सदरा अंगात घालायचा, पण पंचा(धोतर) कधीही नेसायचा नाही. धोतराची घडी करून खांद्यावर टाकायचा. पाहुण्यांचे गाव जवळ आले की स्टँडवर उतरून पंचा नेसायचा नि ऐटीत जायचा.
गावात कुणी विचारलं तर म्हणायचा ,"पावण्यानं सांगितलंय बेंदरीला जेवायला. (बेंदुराचा दुसरा दिवस-या दिवस मांसाहारी जेवण असते.) येतो जरा जाऊन." त्यामुळं आम्हाला आमच्या गावातील बेंदराची चाहूल लागायची.
कधी पावसाला सुरवात झालेली असायची, कधी नसायची.
शनिवारी,रविवारी आम्ही मित्रमंडळी गोणपाटाचं पोतं घेऊन बाहेर पडायचो. थेट तांबड्या मातीचं वारूळ शोधत. दुपार उलटून जायची घरी परतायला. तहान-भूक भरलेली असायची. ते पोतं कोणाला न सांगता तालमीत नेऊन ठेवायचं.
घासभर खाऊन पुन्हा तालमीत. चिखल मळून घ्यायचा. सांजच्याला वस्ताद आले की बैल बनवायला सुरवात करायची. भली मोठी कंबरेइतकी उंच बैलजोडी. गळ्यात व अंगावर डाळी,तांदूळ,धान्ये यांची सजावट करायची. शिंगात खडुगळी(गोड चकल्या) डोळ्यांच्या जागी काचेच्या गोट्या घातलेल्या असायच्या.
बेंदराच्या अगोदर घराघरांत चकल्या, कडबोळी,खिचडा बनविण्याची तयारी चालू असायची.आधल्या रात्री जनावरांची शिंगे रंगविली जायची.बरेच लोक आॅईल पेंटने रंगवताना असत. काही लोक दुकानातून चार-आठ आण्यांची लाल रंगाची माती - त्याला हुरमुंज म्हणत - तेलात मिसळून लावत असत.
आमची आजी कधी हुरमुंज आणायलाही पैसे द्यायची नाही. ती म्हणायची,"आपली रेडी गाभण हाय. लई नटवली तर दृष्ट लागंल कुणाची तरी." आणि प्रत्येक वर्षी चार-पाच म्हैशीतली एखादी तरी गाभण असायचीच . आजीला तेवढंच फावायचं.
मग दादा घरातल्या मडक्यातला थोडा चुना नारळाच्या करवंटीत घेऊन पाणी मिसळून लावायचा म्हैशींच्या शिंगांना. कसातरी दिवसभर टिकायचा. पावसाच्या पाण्यानंही कधी धुतला जायचा तेही कळायचं नाही.
बेंदराची सकाळ उजाडायची ती गोठ्यातच.ओढ्यावर बैल, गायी व म्हैशी धुण्यासाठी न्यायला झुंबड उडालेली असायची.
धुतलेल्या पांढऱ्या शुभ्र रंगाच्या बैलांच्या अंगावर हळद, कुंकू, हुरमुंजाच्या रंगानं भेंडी, बोटे, हाताचे पंजे यांनी नक्षी काढली जायची.
त्यानंतर घराच्या दरवाजांना, शेतीतील मशागतीसाठी उपयुक्त औजारांना पिंपळ किंवा आंब्याच्या झाडाच्या पानांचे तोरण बांधण्याची लगबग सुरू व्हायची.त्या अवजारांची सफाई व्हावी हाच मुख्य उद्देश असायचा.
(पूर्वी बैल हा शेतकरी जीवनाचा अविभाज्य घटक होता.
या सणाच्या दरम्यान शेतीच्या कष्टाची/मशागतीची कामे जवळ जवळ पूर्ण होतात. आपल्या कष्टाचा वाटेकरी म्हणून शेतकरी त्याचा सन्मान करतात.
त्याला न्हाऊमाखू घालतात. ज्यांच्याकडे सजीव बैल नसतात ते लोक मातीच्या बैलांची पूजा करतात.
कुंभार समाजातील लोक घरोघरी मातीचे बैल पुरवतात. काही विशिष्ट समाजातील लोक घरादाराला, शेतीऔजारांना तोरण बांधण्यासाठी पिंपळपानाच्या फांद्या व सुमन नावाच्या गवतापासून वळलेली दोरी देतात. शेतकरीही आपल्या आनंदात सहभागी झाले म्हणून या लोकांना सुपभर धान्य, पोळी,चकली,कडबोळी असा नैवेद्य देतात. त्यास *ब्यारा* म्हणतात.)
दुपारी कर तोडण्यासाठी तिकटीवर गर्दी व्हायची.यावेळी गावातल्या अस्सल खोंडामध्ये चुरस असायची. कर म्हणून एखादी फेसाटी(पेरणी वेळी पेरलेले दाणे झाकून जावेत म्हणून व कोळपणी नंतर मातीत बुजलरले अंकुर उघडे व्हावेत यासाठी शेतात फिरवण्यासाठी मेंदी,घाणेरीच्या फांद्या जोडून तयार केलेले अवजार. अनेकदा *फेसाटी* हा शब्दप्रयोग कथा, कादंबरीत वाचायला मिळतो. तो शब्द वरील वर्णनातील फेसाटीवरूनच घेतलेला असावा.
फेसाटी शेतात फिरवताना फिरवणाऱ्यास अनाठायी वावरभर फिरावे लागते. ओली माती लागून ती कधीकधी इतकी जड होते की, ओढणारा थकून जातो. म्हणून ग्रामबोलीत "माझी फेसाटी करू नका","माझी फेसाटी झाली." असे शब्दप्रयोग रूढ झाले आहेत.)
उभी केली जायची. एक एक खोंडाला मालक थोड्या अंतरावरून पळवत आणून, उडी घेऊन ही फेसाटी ओलांडायला लावत. यावेळी फेसाटीला पायांचा स्पर्श होणारा खोंड पुढच्या फेरीसाठी बाद ठरत असे. प्रत्येक वेळी फेसाटी थोडी थोडी उंच धरली जाई. एका अर्थाने ही बैलांसाठी उंच उडीची स्पर्धा असे. काही वेळा हीच फेसाटी आडवी ठेवली जाई आणि लांब उडीची स्पर्धा होत असे. जिंकणाऱ्या खोंडाला मिरवणुकीत पहिला मान दिला जात असे.
संध्याकाळी मुख्य बैलांची मिरवणूक निघण्याआधी आमची चिल्यापिल्यांची मातीच्या बनविलेल्या, तालमीत ठेवलेल्या बैलांची मिरवणूक काढण्यासाठी धडपड चालू होई.
No comments:
Post a Comment